पाणी प्या... पण नियम पाळून!
पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेद शास्त्रात पाणी पिण्यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते. सध्या सकाळी उठून पाणी पिण्याचे फॅड बरेच वाढत चालले आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्यास आयुर्वेदात ‘उष:पान’ अशी संज्ञा आहे. उष:पान हितकर असले तरी त्यासाठी पिण्याचे पाणी कसे व किती प्यावे, यासंबंधी नियम आहेत.
यासंबंधी नियम माहीत नसल्याने अनेकांना त्यापासून फायदा होण्याऐवजी अपाय होताना दिसून येतात. त्यामुळे पाणी कुणी, किती व कसे प्यावे यासंबंधीचे आयुर्वेदोक्त नियम जाणून घेणे गरजेचे आहे-
* अस्वच्छ, अनेक दिवसांपासून साचलेले, दुर्गंधीयुक्त पाणी पिऊ नये.
* आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक होतेच, तसेच हलकेही होते.
* आम्लपित्त, अग्निमांद्य, पोटदुखी, मूळव्याध, पांडू रोग, उदर, सूज आदी विकारांत शक्य तितके कमी पाणी प्यावे.
* सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.
* फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे.
* जेवणापूर्वी पाणी पिऊ नये. त्याने भूक मंदावते व शरीर कृश होते. जेवताना अधूनमधून थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी ठरते.
* जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे जडपणा व स्थौल्य येते. जेवणानंतर साधारणत: ४५ मिनिटांनी पाणी पिणे बलदायक असते.
* जेवताना आपल्या पोटाचे चार भाग आहेत, असे समजून २ भाग अन्न सेवन करावे. १ भाग पाणी प्यावे. उरलेला १ भाग मोकळा ठेवावा. पोटाला तडस लागेल एवढे अन्न व पाणी घेऊ नये.
* पाणी नेहमी बसून प्यावे, उभ्याने पाणी पिऊ नये.
* उन्हातून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये.
* खूप भीती वाटली असता, थकवा आला असता, मानसिक तणाव असताना पाणी प्यावे. पाणी श्रेष्ठ आश्वासक (धीर देणारे) आहे.
* उष:पान सर्वांच्या हिताचे ठरत नाही. कफ प्रकृतीच्या व्यक्ती, सर्दीचे रुग्ण, आम्लपित्ताचे रु ग्ण, उदर रोगी यांनी उष:पान करू नये. उष्ण ऋतूत उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनाच उष:पान फायदेशीर ठरू शकते. उष:पानासाठी वापरावयाचे पाणी कोमट असावे. जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. विनाकारण तांब्याभर, जगभर पाणी पिऊ नये. त्याने अपाय होतो. फक्त ग्रीष्म (वैशाख व ज्येष्ठ) तसेच शरद (अश्विन व कार्तिक) या दोन ऋतूंत इच्छेनुसार पाणी प्यावे. इतर सर्व ऋतूंत पाणी कमी प्यावे. पावसाळ्यात विशेषत: पाण्याची गरज कमी असते, हे सुचवण्यासाठी निर्जला एकादशीची योजना केली आहे. वरील नियम पाळल्यास पाण्यापासून होणारे आजार हमखास टाळता येतील व ‘पाणी म्हणजे जीवन’ याची प्रचिती येईल.
No comments:
Post a Comment