Friday, 5 May 2023

श्रीरामाची मोठी बहीण शांता हिला रामायणात काहीच महत्व का दिले गेले नाही?

श्रीरामाची मोठी बहीण शांता हिला रामायणात काहीच महत्व का दिले गेले नाही?

रामायणात श्रीरामाची मोठी बहीण शांता आणि तिचे पती ऋषी शृंगी यांचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या पेक्ष्या शांता ही वयाने बरीच मोठी होती.

एकबाणी, एकपत्नी व एकवचनी राम हा जाणता राजा होता व भारतात अनेक ठिकाणी राम लक्ष्मण सीता यांची देव म्हणून पूजा केली जाते. 
रामाला तीन भाऊ होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण रामाला एक बहीणही होती याची माहिती फारच थोड्यांना असेल.
शांताची माहिती सांगणारी एका कथेत असे सांगतात की, तिच्या जन्मानंतर अयोध्येत १२ वर्षे दुष्काळ पडला.
 हा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर दशरथ राजाने तिची रवानगी तिच्या मावशीकडे केली. त्यानंतर शांता परत कधीच अयोध्येला आली नाही.

अजुन एका कथेत असे सांगितले आहे की, अंगदेश नरेश रोमपद म्हणजे वर्षीणीचा पती (शांताची मावशी ) शांतेशी खेळण्यात मग्न असताना एक ब्राह्मण पावसाळ्यातील शेतीकामासाठी राजाची मदत मागण्यास आला पण राजाने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला.
 त्यामुळे रागावलेल्या इंद्राने तेथे पाऊस पाडलाच नाही. शेवटी श्रृंग ऋषींनी त्यावर उपाय म्हणून यज्ञ केला. 
नंतर पाऊस पडला. 
खूष झालेल्या राजा रोमपद शांतेचा विवाह या ऋषींबरोबर करून दिला. 
तिचे मंदिर तिच्या पतीसह बांधले गेले.

रामाच्या बहीणीचे, देवी शांताचे मंदिर

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रामाची बहीण देवी शांता हिचे मंदिर आहे. 
या मंदिरात ती आपले पती ऋषी श्रृंग यांच्यासोबर विराजमान आहे.
 देशभरातून दूरदूरून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. 
कुल्लू पासून ५० किमी अंतरावर हे मंदिर आहे.

शांता बद्दल अजुन एक कथा आहे, तिला अंगदेशाचा राजा रोमपद यांना दत्तक दिली होती.
 रोमपदची पत्नी वर्षिणी ही कौसल्येची बहीण म्हणजे रामाची मावशी होती. 
राजा रोमपद याला अपत्य नव्हते व ते अयोध्येला आले असताना राणी वर्षिणीने चेष्टेने तुझे अपत्य मला दे अशी मागणी राणी कौसल्या कडे केली.
 त्यामुळे शांता देवीला त्यांच्याकडे सोपविले व ती अंगदेशाची राजकुमारी बनली. ती वेद, कला, शिल्पशास्त्रात निपुण होतीच पण अत्यंत सुंदर होती.

शांता आणि ऋषि श्रृंग यांचे वंशज हे सद्या सेंगर राजपूत आहेत, ज्यांना एकमात्र ऋषि वंशी राजपूत म्हटलं जातं.

राजा दशरथ यांचे अर्धे आयुष्य उलटुन गेले तरी, त्यांना पुत्र नव्हता. राज घराण्याचा वारसा चालविण्यासाठी पुत्र असावा, अशी इच्छा कुलगुरु वशिष्ठ यांना राजा दशरथाने सांगितली. तेव्हा ऋषी वशिष्ठ यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करावा असा सल्ला दिला. 
या यज्ञाचे मुख्य अतिथी म्हणुन क्षेत्रीय कुळातील श्रेष्ठ ऋषी आणि जावई ऋषी श्रृंग यांना मान दयावा असे कुलगुरू वशिष्ठ यांनी सांगितले.
 त्यानुसार ऋषी श्रृंग यांना मुख्य अतिथी म्हणुन मान दिला, आणि राजा दशरथ आणि तिन्ही राण्या सेवक म्हणून सर्व सेवा करीत होते. 
यज्ञ पुर्तीच्या वेळेस तिन्ही राण्यांना पयास (प्रसाद) तीन गोळे देण्यात आले. 
तेव्हा राणी सुमित्रा हिचा प्रसादाचा गोळा घारीने झडप मारून नेला. तो घारीच्या चोचीतुन निसटला, आणि अंजनीने ( हनुमानाची आई) हिने प्राशान केला. त्यातून हनुमानाचा जन्म झाला. यावर संत नामदेवांचा अभंग आहे.

पिंड घारीने झडपिला । अंजनीने तो सेविला ।

अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटी॥धृ॥

चैञ शुध्द पोर्णिमेसीं । सुर्योदय समयासी ।

महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्या वंदिला ।।

नंतर कौसल्या आणि कैकयीने आपल्या प्रसादा तुन अर्धा - अर्धा प्रसाद सुमित्रा हिला दिला. त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण शत्रुघ्न जुळे आणि भरताचा जन्म झाला.

त्यामुळे जास्त चर्चा नसली तरी, शांता आणि पती ऋषी श्रृंग यांना या चौघा राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळते.
स्रोत :-

अभंग : पिंड घारीने झडपिला

रामाच्या बहीणीचे, देवी शांताचे मंदिर - Majha Paper

No comments:

Post a Comment